Sunday, January 15, 2023

 एक कथुली 

एक सुरवंट होता,छोटासा पण बरासचा कुरूप.त्याने एकदा एक गुलाबाचे फुल बघितले आणि त्या फुलाच्या लोभस-नाजुक रुपाने तो मोहीत झाला.त्या फुलाच्या सानिध्यात राहण्याचा प्रयास करू लागला.पण अचानक एकदा खूप जोराचा वारा आला आणि तो त्या फुलापासुन फार लांबवर फेकला गेला.मनात फुलाची आठवण होती ,मनात प्रेमाची साठवण होती.असाच काळ लोटत गेला ,सुरवंट आपल्याच कोशात लपेटत गेला.फुलाची रंगीत सोबत आठवत कसाबसा जगत राहीला.अशाच एका पहाटे त्याला जाग आली , तो रोमांचित झाला.त्याच्या कुरूप शरीरावर छानसे रंगीबेरंगी पंख आले होते.तो आता हवेत ऊडु शकत होता.आपल्या सर्व ताकदीने तो आकाशात झेपावला आणि उडत उडत फुलाजवळ जाऊन पोहचला.पण फुलाने त्याला ओळखलेच नाही ते आपल्याच कैफात डोलत राहीले ,रंगेल भुंग्यांशी बोलत राहीले.सुरवंटाला खुप वाईट वाटले.तो क्षणभरसुद्धा तेथे थांबला नाही.मनातले कढ रिचवत दूर निघून गेला.अतिव दुःखात झुरत राहीला.एका बेसावध क्षणी निवडुंगाशी टकरावला.त्याचे सुंदर पंख पार फाटून गेले.शरीरात काटे घुसून ते रक्ताने माखले.तो मातीत पडला आणि माती होऊन गेला.पावसाच्या पाण्यात माती भिजली आणि एके दिवशी त्याच मातीत एक गुलाबाचे रोपटे ऊगवले.त्यावर एक फुल फुलले पण कुणालाच कळले नाही ते इतके लाल लोभसवाणे कसे झाले..

Wednesday, June 3, 2020

'मी' आणि 'तु'.....

हे राजन् ,
माणूस इतरांचा चेहरा पाहू शकतो पण स्वतःचा नाही.स्वतःच स्वतःला कसे पाहायचे?
ते शक्य नाही.म्हणुनच कि काय विधात्याने जोडीदार बनवला
आणि या 'मी मी' बरोबरच 'तु' ला बनवले.
जग निर्माण केले.....
आता गंमत अशी की या 'मी' शिवाय 'तु' अपूर्ण आहे तर 'तु' वाचून 'मी' !
हा खेळ मांडून देव मात्र पळून गेला 
आणि माणसांच्या वाट्याला आले मात्र भोगवटे
आनंदाचे,दु:खाचे.मिलनाचे आणि विरहाचे.....
जेव्हा जेव्हा 'मी' वाचून 'तु' अथवा 'तु'वाचून 'मी' एकटा पडतो
तेव्हा त्यांच्या सोबत असतात केवळ आठवणी.
क्षणांच्या,दिवसांच्या,जन्मांच्या किंवा जन्मजन्मांतराच्या.....
आठवणी जपता येतात पण जगता मात्र येत नाहीत.
'मी' चा चेहरा पुन्हा एकदा हरवतो
आणि पळुन गेलेला देव मात्र हसत राहतो !





मैना...