Wednesday, August 14, 2013

गाई पाण्यावर ...कवी "बी"


गाई  पाण्यावर काय म्हणुनि आल्या |  का ग गंगायमुनाहि या मिळाल्या ?| उभय पितरांच्या चित्तचोरटीला| कोण माझ्या बोलले गोरटीला ?
उष्ण वारे वाहती नासिकात | गुलाबाला सुकविती काश्मिरात| नंदनातिल हलविती वल्लरीला | कोण माझ्या बोलले छबेलीला ? वरील दोन ओळी  म्हणजे कवीला प्रथम दिसलेली ,कोपरयात एकटीच रडणारी त्याची लाडकी मुलगी .तिच्या दोन्ही डोळ्यातले ओघळणारे अश्रू म्हणजे गंगा आणि यमुना किंवा अबोल ,निरागस गाईंचे मूक आक्रंदन .आजी -आजोबांपासून घरात सर्वांच्या गळ्यातला ताईत असणारी ती गोरीगोमटी ,छबेली लेक आहे.ती अशी धसमुसुं रडताना पाहून काश्मिरातले  गुलाब सुकतात ,नंदन वनातील वेली हलतात . बापाचे काळीज पाझरते. "बाळे,कोण तुला काय बोलले ?"
शुभ्र नक्षत्रे चंद्र चांदण्याची  | दूड रचलेली चिमुकली मण्यांची |गडे , भूईवर पडे गडबडून| का ग आला उत्पात हा घडून ? विभा-विमला आपटे-प्रधानांच्या | अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या | गौर चैत्रींची तशा सजुनि येती | रेशमाची पोलकी छिटे लेती.|
तुला ’लंकेच्या पार्वती’ समान | पाहुनीया, होवोनि साभिमान|काय त्यातिल बोलली एक कोण|’अहा ! आली ही पहा, भिकारीण!’
मुली असती शाळेतल्या चटोर | एकमेकीला बोलती कठोर|काय बाई , चित्तांत धरायाचे |शहाण्याने ते शब्द वेडप्यांचे !
वरील चार ओळीत तिच्या रडण्याचे कारण स्पष्ट होते आहे . तुझ्या अशा रडण्याने आकाशातली सगळी नक्षत्रे खाली कोसळतील आणि जणु  उल्कापात होईल.तु अशी रडू नको . श्रीमंतांच्या कुणी विभा,विमला नावाच्या मैत्रीणीनि तिच्या फाटक्या वस्त्रांची टिंगल करत तिला पार खोलवर डीवचले आहे .पण तू शहाण्यासारखी वाग ,त्यांचे वेडे बोलणे मनावर घेऊ नकोस . इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही -"धनिक आपटे-प्रधान ,त्यांच्या मुली चैत्र गौरी प्रमाणे रेशमी वस्त्रांनी नटून येतात ".कवी त्यांचे वर्णन सुद्धा तितक्याच ममतेने करतो आहे .कुठेच द्वेष,सूड भावना नाही. नाहीतर एखाद्याने किती शिव्या हासडल्या असत्या त्याचा काही नेम नाही! शाळेतल्या मुली अशाच खोडकर असतात ,बाळे त्यांचे मनावर घेऊ नकोस . असा समजूत काढण्याचा प्रयत्न पण आतून मन मात्र फाटून गेलेले . उद्विग्न अवस्थेत मनात चाललेले विमुक्त चिंतन मात्र आपल्याला अंतर्मुख करते ते असे-

रत्‍न सोने मातीत जन्म घेते |राजराजेश्वर निज शिरी धरी ते|कमळ होते पंकांत, तरी येते|वसंतश्री सत्कार करायाते.
पंकसंपर्के कमळ का भिकारी ? धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी ?सूत्रसंगे सुमहार का भिकारी ?कशी तूही मग मजमुळे भिकारी ?

बालसरिताविधुवल्लरीसमान | नशीबाची चढतीच तव कमान| नारिरत्‍ने नरवीर असामान्य|याच येती उदयास मुलातून.
भेट गंगायमुनास होय जेथे | सरस्वतिही असणार सहज तेथे | रूपसद्‍गुणसंगमी तुझ्या तैसे| भाग्य निश्चित असणार ते अपेसे.
नेत्रगोलातुन बालकिरण येती | नाच तेजाचा तव मुखी करीती | पाच माणिक आणखी हिरा मोती | गडे , नेत्रा तव लव न तुळो येती.
लाट उसळोनी जळी खळे व्हावे,| त्यात चंद्राचे चांदणे पडावे | तसे गाली हासता तुझ्या व्हावे | उचंबळुनी लावण्य वर वहावे !

गौरकृष्णादिक वर्ण आणि । त्यांच्या छटा पातळ कोवळ्या सम वयांच्या | सवे घेउनि तनुवरी अद्‌भुतांचा |खेळ चाले लघु रंगदेवतेचा !
काय येथे भूषणे भूषवावे | विविध वसने वा अधिक शोभवावे ?| दानसीमा हो जेथ निसर्गाची । काय महती त्या स्थली कृत्रिमाची !
सोने माणिक-रत्ने मातीत जन्म घेतात, राजांच्या मुकुटात शोभतात.कमळ  चिखलात जन्मते पण वसंत त्याचे स्वागत करतो.चिखलात राहून कमळ  भिकारी होते का ?धुळीत राहून रत्न भिकारी होते का ?साध्या दोरयात राहून फुलांचा हार भिकारी होतो का ?मग ,बाळे, माझ्यामुळे तू कशी भिकारी ?नाही असे असणे शक्य नाही कारण मुली तू निसर्गाचे  एक अमूल्य देण आहेस .येथे कृत्रिमतेला वाव नाही . सारी आभूषणे तुझ्या पुढे फिकी पडतील.बाळे, तुझ्या बाल नेत्रांतून येणारी ही सोनेरी किरणे तुझ्या मुखकमलावर बघ कशी अलगद सजत आहेत . माणिक रत्नानाही लाजवत आहेत  . तुझ्या गालावर पडलेली खळी  म्हणजे जणू सागरात उसळणाऱ्या लाटांमुळे जसे  भोवरे निर्माण होतात आणि आहा पहा त्यात जर चांदणे पडले तर किती मनोहर चित्र साकारेल .तुझे हंसू सुद्धा तसेच आहे .अशा अद्‌भुत रंगदेवतेची तू निर्मिती आहेस . गंगा आणि यमुना जिथे असतात तिथे सरस्वती ही असतेच असते .म्हणून मला खात्री आहे की तू रूप-सदगुणी असून तुझा भाग्योदय हा निश्चित आहे तुझ्या नशिबाची कमान  चढती आहे आणि माझ्या पवित्र भूमीने अशी अनेक नारी रत्ने निर्माण केलेली आहेत . हा मनोआलाप  आता पुढील ओळीत एका वेगळ्याच गूढ संवादाच्या पोकळीतल्या गंधारात आपल्याला घेऊन जातो .. 
खरे सारे , पण मूळ महामाया|आदिपुरुषाची कामरूप जाया|पहा नवलाई तिच्या आवडीची|सृष्टीशृंगारे नित्य नटायाची.
त्याच हौसेतुन जगद्रूप लेणे|प्राप्त झाले जीवास थोर पुण्ये |विश्वभूषण सौंदर्यलालसा ही|असे मूळातचि, आज नवी नाही !
नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध,|सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध | तोच बीजांकुर धरी तुझा हेतू |विलासाची होशील मोगरी तू !
तपःसिद्धीचा ’समय’ तपस्व्याचा|’भोग’ भाग्याचा कुणा सभाग्याचा |पुण्यवंताचा ’स्वर्ग’ की, कुणाचा,|’मुकुट’ कीर्तीचा कुण्या गुणिजनाचा.
’यशःश्री’ वा ही कुणा महात्म्याची,|’धार’ कोण्या रणधीर कट्यारीची;|दिवसमासे घडवीतसे विधाता|तुला पाहुन वाटते असे चित्ता

तुला घेइन पोलके मखमलीचे|कुडी मोत्यांची, फूल सुवर्णाचे,|हौस बाई , पुरवीन तुझी सारी,|परी आवरि हा प्रलय महाभारी !
ढगे बळकट झाकोनि चंद्रिकेला|तिच्या केले उद्विग्न चांदण्याला,|हास्यलहरींनी फोडुनी कपाट|प्रकाशाचे वाहवी शुद्ध पाट !
विश्वंबराची आदीमाया तूच आहेस आणि या युगुल परिणयाचा परिणाम स्वरूप सारे सृष्टी सौंदर्य तुला प्राप्त झाले आहे आणि जिवाला प्राप्त झालेली अंकूरावस्था ही याच युगुलांच्या हौसेतून निर्माण झालेली आहे म्हणून तू मूळमाया साऱ्या  चराचराला व्यापून आहेस तू आजची नाहीसच मुळी.नारायणी ,तुझ्या पुण्य पावलांची लेणी हेच नारी रुपातले तुझे मायावी रूप आहे .म्हणूनच विलासाची सुगंध मॉगरी तू माळशील यात यत्किंचितही शंका नाही .तू कुणी सामान्य नाहीस .तू तपसव्यांचे  तेज आहेस ,सुभग आहेस ,पुण्यस्वरूप स्वर्ग आणि सत्वशील मुकुटमणी आहेस,सर्वशक्तिमान ,यशश्री ती तूच आहेस .तुला घडवताना विधात्याचे हात निरंतर कार्यमग्न आहेत . बलाढ्य ढगांनी चंद्रकलेला झाकून तिचे चांदणे जरी निष्प्रभ केले तरी तुझी हास्यरूपी सूर्य किरणे आकाशात प्रकाशाचे झोत क्षण्मात्रात टाकतील.तेव्हा बाई, हा प्रलय आता आवर .मी घेईन तुला रेशमी पोलके ,सुवर्ण मोत्यांची कुडी ,पूरविन तुझी सगळी हौस.भावमग्न समाधीत गेलेला हा हंस प्रणव ओंकाराच्या पैसातून पुढे अलगद खाली उतरतो .रागातले स्वरालाप आता समेवर येतात ….

प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे|कोड किंचित पुरविता न ये त्यांचे;|तदा बापाचे ह्रदय कसे होते,|न ये वदता, अनुभवि जाणती ते !
माज धनिकाचा पडे फिका साचा|असा माझा अभिमान गरीबाचा|प्राप्त होता परि हे असे प्रसंग|ह्रदय होते हदरोनिया दुभंग !
देव देतो सद्‌गुणी बालकांना|काय म्हणुनी आम्हास करंट्याना ?|लांब त्याच्या गावास जाउनीया|गूढ घेतो हे त्यास पुसोनीया !
"गावि जातो," ऐकता त्याच काली|पार बदलुनि ती बालसृष्टि गेली !गळा घालुनि करपाश रेशमाचा|वदे "येते मी" पोर अज्ञवाचा !
प्राणप्रिय अपत्यांचे लाड न पुरविता येणारा मी अभागी बाप आहे आणि देव तरी अशा सुंदर सद्गुणी बालकांना आम्हा करन्ट्यांच्या पोटी जन्माला का घालतो ?नाही हे त्याच्या गावी जाउन त्याला विचारतोच."गावाचे नाव " मात्र ,लेक निरागस आनंदात पित्याला गळा रेशीम मिठी घालते . जणू (आदी )मायेचा पाशच …

No comments: