Wednesday, August 3, 2016

भातुकली

हे राजन् ,  
काळाची सत्ता फक्त या शरीरावर चालते.आत्मभानावर नाही.
तरीही कोणत्या आदिम प्रेरणेने हे मेले शरीर हलत असते ,डुलत असते ? 
कोण कोणाला भातुकलीच्या या खेळात झुलवत असते?

मायावी मारीच्याची समज सीतेला नव्हती?
येणा-या काळाच्या भयसूचकतेचे संकेत श्रीरामाच्या अर्धांगिनीला कां कळत नव्हते?
पण तिचा खेळच वेगळा होता.
दिव्यत्वाचे लेणे पांघरून आलेली सीता कुठल्याही अटीवर ,सबबीवर 
आपले बालपण हरवायला तयारच नव्हती.पुढचे रामायण सर्वविदीत आहे.
या खेळात तिची काही गाडकी-मडकी फुटलीही असतील.असू देत.
पण तरीही तिने हा खेळ मांडला ! 
मागे पुढे आकांतच आकांत उभा केला.
आपण मात्र अशा हलत्या डुलत्या शरीरावर उगीचच आत्म्याचे थोर पहारे बसवून देतो.
सर्व वेदान्ताची उगीचच पोपटपंची करतो.
त्या ऐवजी अश्रूंचा आधार घ्यावा.
निसर्गाने माणसाला दिलेली ही सर्वात मोठी देणगी आहे.
जिभेपेक्षा डोळे अधिक बोलके असतात ,
पण डोळ्यांना ज्या अनेक भाषा अवगत असतात ,
त्यात अश्रूंइतकी प्रसन्न ,भावनापूर्ण आणि ह्रदयंगम अशी दुसरी कुठलीही भाषा नाही !


"अश्रूंना नाही रूप नि कसला रंग
का व्यर्थ जुळविता ओवी आणि अभंग
जाणारा जातो ,अनंत आहे काळ
 तरीही मांडावा भातुकलीचा हा खेळ "

No comments: