Saturday, July 20, 2013

भावस्मरण

इंदिरा संत , मराठी सारस्वताला लाभलेल एक अपूर्व रत्न.बाईंची कर्मभूमी बेळगावातली.अतिशय शालीन ,मृदु आणि प्रेमळ व्यक्तिमत्व.बेळगावात त्या सर्वांना "आक्का" म्हणूनच परिचित होत्या.मानेभोवती पदर, मऊ सुती छापील पातळ आणि नेहमी प्रसन्न वदन असे व्यवधान.साधी राहणी आणि कुणालाही मदत करण्याची वृत्ती .शारदेच रूप बहुदा असच असाव .बाईंच साहित्य जितक समृद्ध होत त्याहीपेक्षा दुखी व्यक्तिगत आयुष्य होत.पण त्याची पुसटशी छायाही त्यांनी आपल्या कलाकृतीत पडू दिली नाही.त्या अवघ्या दहा वर्षांच्या असताना वडील गेले.काकांच्या धाकात त्या मोठया झाल्या.आयुष्याला थोडे गोंडस वळण लागल जेव्हा पुण्याच्या फर्गुसन विद्यापीठात शिकताना ना.मा.संतांशी ओळख झाली.विद्यापीठाच्या निसर्गरम्य आवारात जमलेले प्रेम पुढे विवाहात रुपांतरीत झाल .पुढची दहा एक वर्ष त्यांच्या जीवनातील हा काळ  आत्यंतिक समाधान आणि सर्वच बाबतीत सृजनाचा काळ  होता.पण नियतीच्या मनात काही वेगळेच होत.अल्पश्या आजाराचे कारण होऊन ना मा संत अचानक गेले.पदरात तीन पिल्लांना सांभाळत बाईंनी त्यांना वाढवल.नोकरी आणि टेकडीच्या पायथ्याशी असलेल घर यांच्यामधील पायवाट यात त्यांचे दिवस जात राहिले.याच पायवाटेच्या दुतर्फा असलेल्या सुंदर माळरानात त्यांना कविता स्फुरल्या पण त्या नुसत्याच कविता नव्हत्या तर त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर "पोळून निघालेल्या संघर्षमय व्यक्तिमत्वाच्या ठिणग्या" होत्या.पण रसिकांना त्यात कधी दाहकता दिसली नाही पण एक विदेही ,शालीन आणि करूणामय लयबद्ध आर्तता मात्र सतत जाणवली.ही किमया होण्यास कारण बाईंचा पिंडच मुळी सुकुमार कोमलतेचा गाभा होता.
नुकतीच बाईंची १०० वी जयंती  होऊन गेली त्यानिमित्ताने त्यांना भावपूर्ण ,बुद्धिपूर्वक सादर प्रणाम.

रक्‍तामध्ये ओढ मातिची, मनास मातीचे ताजेपण
मातीतुन मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन

कोसळताना वर्षा अविरत स्‍नान समाधी मध्ये डुबावे
दंवात भिजल्या प्राजक्‍तापरी ओल्या शरदामधि निथळावे

हेमंताचा ओढुन शेला हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे छापिल उंची पातळ ल्यावे

ग्रीष्माची नाजूक टोपली उदवावा कचभार तिच्यावर
जर्द विजेचा मत्‍त केवडा तिरकस माळावा वेणीवर

आणिक तुझिया लाख स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे
उभे राहुनी असे अधांतरि तुजला ध्यावे तुजला ध्यावे

Monday, July 15, 2013

होड्या

ती खूप आवडत असते .अगदी मनाच्या तळापासून.उमेदवारीचे वय.मनात असलेली प्रेमाची हुरहुर.तिच्या सगळ्या गोष्टी,आवडीनिवडी ठाउक आहेत फक्त एका गोष्टीचा पडताळा व्हायचाय.जमायच आहे कोणी प्रियवंदान्च्या घरी, काही कार्यक्रमाच्या निमित्ताने.तिथे घडलेय हे सगळ् .तिथेच उलगडलय एक कटू सत्य.मनात चाललेली घालमेल मांडली जातेय "मला ना पुष्कळ होड्या येतात ...." .ती येते. कशी ? गाडी चालवत हे माहित करून घेतल जात कारण तिच्याकडेच आहे ना सगळ् लक्ष.ती येते तेव्हा तो पाहतोय तिच्याकडे, अगदी बारीक ,तिरक्या नजरेने.ती आपल्याच मस्तीत खूप बडबडी इथूनच सुरवात होतेय त्या कटू सत्याची .थोडा अचंबा .ती बोलत नाही त्याच्याशी .त्यालाही  आवडत नाही तिने लाडावून जवळ घेतलेल्या "डॉगी"ला.मनातली घालमेल चालूच आहे.लौकिक अर्थाने त्याला जावई करून घेण्याला कोणीच विरोध करू शकत नाही कारण तस व्यगुण्य नाही त्याच्यात.म्हणून तर मुलीचा बाप दोनदा विचारतोय आणि तो ही तेच उत्तर देतोय .पण ....पण त्याला सत्य कळतय. तिच्या मनातल समजतय. काहीतरी मन मोडणार. .म्हणून तर तो नकार देतोय दुसर्यांदा दिल्या जाण्यारा फरसाणाला आणि तोही "तिच्याकडून".सोपस्करास्तव निरोप. आता कटू सत्य समजल्य.मनातली घालमेल थांबलीय .आता  नाही कसलाच विचार करायचाय म्हणून तर तो म्हणतोय -
पाऊस ना,पडलाच नाही
पाणी ना,वाह्यलचं नाही
होड्या ना,सोडल्याच नाहीत
होड्या ना,केल्याच नाहीत.

पण....




मला पुष्कळ होड्या येतात
बंबी होडी,नांगर होडी,शिडाची आणि साधी होडी

बिट्टू कधीतरी म्हणत होता
तो नेहमीच काहीतरी म्हणतो म्हणा,
कॊफी तर सगळेच प्यायलो,
ती चालवत आली होती म्हणे गाडी

बंबी होडी,नांगर होडी,शिडाची आणि साधी होडी.

बोलण तर बोलायच असतं,
सगळेच काय काय बोलत होते,
माझ्याशी नाही पण तीही चिकार बडबडली,
पुष्कळजण होते, मी बोललोच नाही काही.

बंबी होडी,नांगर होडी,शिडाची आणि साधी होडी.

चिंकू कुत्रा गोडीत होता:
ऒव-यॊव, इकडे धाव-तिकडे धाव
तिच्याशी तर फारच गोडीत होता,
तीही भलतीच गोडीत होती.

बंबी होडी,नांगर होडी,शिडाची आणि साधी होडी.

दास अंकलनी मला विचारला
पहिलाच प्रश्न दुस-या वेळेला
मी सांगितलं म्हणा दोनदा
पण ती म्हणाली,"पपा,तुम्ही कमालच करता,"

बंबी होडी,नांगर होडी,शिडाची आणि साधी होडी.

कॊफी तर तिनच दिली
तेव्हा मी नि गंधेकाका चेस खेळत होतो,
फरसाणसुध्दा तिनच आणला:
एकदा घेतल,दुस-यांदा नाही म्हणालो

बंबी होडी,नांगर होडी,शिडाची आणि साधी होडी.

दारापर्यंत सगळेच गेलो,
तीही म्हणाली,"बराय अंकल,बराय ऒटीं
टाटा बिट्टू, टाटा चिंकू’
नंतर म्हणालीच नाही काही

बंबी होडी,नांगर होडी,शिडाची आणि साधी होडी.

पाऊस ना,पडलाच नाही
पाणी ना,वाह्यलचं नाही
होड्या ना,सोडल्याच नाहीत
होड्या ना,केल्याच नाहीत.

पण मला पुष्कळ होड्या येतात
बंबी होडी,नांगर होडी,शिडाची आणि साधी होडी.

जिना

असा जीना प्रत्येकाला कधी ना कधीतरी भेटलेला असतो .पण हा काळ थोडा जुना म्हणजे साधारण ३०-३५ वर्षापूर्वीचा आहे.घरे छोटी दोन वा तीन मझली.लिफ्टची गरज नसायची.ये जा जिन्यावरुनच.जिन्यात काहीसा उजेड काहीसा अंधार.कवी मनाला मग आठवतात काही अलवार कोमल आठवणी ,अंधारातले थोडे धडपडणे,चोरून चोरून केलेल्या काही हरकती ज्याना छतावरची पाल साक्ष आहे.कवीला मग त्या नागमोडी वळणाचे गमक कळते.त्याला तो इतका आवडतो आहे की स्वर्गाच्या सोपानाला ही असे नागमोडी जीन्याचे वळण असावे अशी त्याची इच्छा आहे..
कळले आता घराघरांतुन
नागमोडीचा जिना कशाला
एक लाडके नाव ठेवुनी
हळूच जवळी ओढायाला

जिना असावा अरुंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही नच जिथे कळावी
अंधारातील अधीर धडपड

मूक असाव्या सर्व पायऱ्या
कठडाही सोशीक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा

वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली द्यावी घ्यावी
मात्र छतातच सोय पाहुनी
चुकचुकणारी पाल असावी

जिना असावा असाच अंधा
कधि न कळावी त्याला चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधि न करावी चहाडखोरी

मी तर म्हणतों- स्वर्गाच्याही
सोपानाला वळण असावे
पृथ्वीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरी हसावे


- वसंत बापट