Saturday, July 20, 2013

भावस्मरण

इंदिरा संत , मराठी सारस्वताला लाभलेल एक अपूर्व रत्न.बाईंची कर्मभूमी बेळगावातली.अतिशय शालीन ,मृदु आणि प्रेमळ व्यक्तिमत्व.बेळगावात त्या सर्वांना "आक्का" म्हणूनच परिचित होत्या.मानेभोवती पदर, मऊ सुती छापील पातळ आणि नेहमी प्रसन्न वदन असे व्यवधान.साधी राहणी आणि कुणालाही मदत करण्याची वृत्ती .शारदेच रूप बहुदा असच असाव .बाईंच साहित्य जितक समृद्ध होत त्याहीपेक्षा दुखी व्यक्तिगत आयुष्य होत.पण त्याची पुसटशी छायाही त्यांनी आपल्या कलाकृतीत पडू दिली नाही.त्या अवघ्या दहा वर्षांच्या असताना वडील गेले.काकांच्या धाकात त्या मोठया झाल्या.आयुष्याला थोडे गोंडस वळण लागल जेव्हा पुण्याच्या फर्गुसन विद्यापीठात शिकताना ना.मा.संतांशी ओळख झाली.विद्यापीठाच्या निसर्गरम्य आवारात जमलेले प्रेम पुढे विवाहात रुपांतरीत झाल .पुढची दहा एक वर्ष त्यांच्या जीवनातील हा काळ  आत्यंतिक समाधान आणि सर्वच बाबतीत सृजनाचा काळ  होता.पण नियतीच्या मनात काही वेगळेच होत.अल्पश्या आजाराचे कारण होऊन ना मा संत अचानक गेले.पदरात तीन पिल्लांना सांभाळत बाईंनी त्यांना वाढवल.नोकरी आणि टेकडीच्या पायथ्याशी असलेल घर यांच्यामधील पायवाट यात त्यांचे दिवस जात राहिले.याच पायवाटेच्या दुतर्फा असलेल्या सुंदर माळरानात त्यांना कविता स्फुरल्या पण त्या नुसत्याच कविता नव्हत्या तर त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर "पोळून निघालेल्या संघर्षमय व्यक्तिमत्वाच्या ठिणग्या" होत्या.पण रसिकांना त्यात कधी दाहकता दिसली नाही पण एक विदेही ,शालीन आणि करूणामय लयबद्ध आर्तता मात्र सतत जाणवली.ही किमया होण्यास कारण बाईंचा पिंडच मुळी सुकुमार कोमलतेचा गाभा होता.
नुकतीच बाईंची १०० वी जयंती  होऊन गेली त्यानिमित्ताने त्यांना भावपूर्ण ,बुद्धिपूर्वक सादर प्रणाम.

रक्‍तामध्ये ओढ मातिची, मनास मातीचे ताजेपण
मातीतुन मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन

कोसळताना वर्षा अविरत स्‍नान समाधी मध्ये डुबावे
दंवात भिजल्या प्राजक्‍तापरी ओल्या शरदामधि निथळावे

हेमंताचा ओढुन शेला हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे छापिल उंची पातळ ल्यावे

ग्रीष्माची नाजूक टोपली उदवावा कचभार तिच्यावर
जर्द विजेचा मत्‍त केवडा तिरकस माळावा वेणीवर

आणिक तुझिया लाख स्मृतींचे खेळवीत पदरात काजवे
उभे राहुनी असे अधांतरि तुजला ध्यावे तुजला ध्यावे

No comments: