Tuesday, September 22, 2015

आकांताचे जगणे

माणसाने रूढार्थी असणे हेच बरे.परंपरेविरूध्द जाणे सगळ्यानांच जमत नाही आणि तशी काही अटही नसते, नसावी.
अनुभवसिध्द तुकाराम सांगतो -
"ओंकार प्रधान रूप गणेशाचे । हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ।।
अकार तो ब्रम्हा ,ऊकार तो विष्णू । मकार महेश जाणियेला ।।
ऐसे तिन्ही देव जेथोनि उत्पन्न । तो हा गजानन मायबाप ।।"
पण पुराणेषुपरंपरा कुणाला कुणाचा बाप बनवेल काय सांगावे? असो.
आकांताचे जगणे कुणाच्याही वाट्याला येवू शकते ,येतेही पण तुकारामासारखा एखादाच त्यातला गूढार्थ जाणू शकतो.पण काहींना मात्र ह्या निळाईचे वेड लागते ,नियतीच्या ह्या जीवघेण्या खेळाचा नाद जडतो.मग -
'पुन्हा पुन्हा मरण । घरी दारी बाहेर ...शयनी । सर्व ठिकणी ' याखेरीज गती उरत नाही.
अशा अवस्थेत जगण्या-याचा एका निराळ्या अर्थाने शुभाशुभाचा किनारा फिटत असतो.त्याच्या लेखी मंगल -अमंगलाची लेबले ,रद्द केलेल्या नोंटासारखी कवडीमोल झालेली असतात.-सारेच निरपेक्ष होते ! सा-याच भासचक्राचा भेद होतो अन् उमजू लागते-
"सावल्यांच्या पल्याड असा एक देश 
जिथला वेष नको उतरायला ,चढवायला"
किंवा ..
" हा प्रश्न जिवाला छळतो
टिचलेले बिल्वर हसती
कोणत्या फुलातून गळते
कोणत्या फुलाची माती?"

No comments: