Wednesday, December 30, 2015

पांडगावकर सर ...

Wednesday, December 23, 2015

तडजोड

"तडजोड" 
शब्द तसा फारच बोजड आहे.
अगदीच फोड करायची झाली तर "तड्यांना जोडण्यांचा प्रयत्न म्हणजे तडजोड" 
असा काहीसा करावा लागेल.काचेप्रमाणे फुटकळ स्वभावाची माणसे कधीच जुळत नाहीत ,
प्रयत्न केलात तर जखमाच होण्याची शक्यता जास्त.
पण काहीं जणांची मने मात्र पाण्याप्रमाणे समंजस असतात ,
इथे तड्यांचे तरंग होतात तेही क्षणभरच नंतर मात्र अखंड पाणीच,
 फक्त गारवाच देणारं.आयुष्याच्या प्रवासात तडजोडी सुद्धा पाण्यासारख्या असाव्यात 
,इतरांचे वेगळेपण स्वीकारत ,समजून घेउन 

हळूहळू एकमेकांसारख होउन जाणा-या !

संवेदना

संवाद हरवलाय. 
सर्वाना 'आनंदयात्रा' हवी ,"
आनंदयोग" मात्र कुणालाच नको.
गाणी हवी , सूर नको आणि सूरातली कट्यार तर नकोच नको.

"मनमंदिरा ,तेजाने उजळून घेई ,साधका।
संवेदना ,"संवादे" सह"वेदना" जपताना।।"

अहो , वेदनेला पाहूनच जिथे सगळे पळपूटे पळून जातात ,
 तिथे कसला आलाय "सह"वास-संवाद ?
पण "आनंदयोगाची" कट्यार हवी असेल,
 तर ही बंदिश टोचून घेण्याची क्षमता हवी तरच स्वयंप्रकाश मिळेल ,काजव्यांसारखा!

आठवांची तंद्री

मुक्ते ,
थोड ऐक.माझ्या निजेला धक्का ही न लावता रोज तू येऊन जातेस ,
पण मग पदरातही मावणारं नाहीत इतके घुंगरू जवळ का बरे घेतेस?
आणि प्रत्येक घुंगुराच्या इवल्याला नादुकलीला आठवांची तंद्री मात्र जोडून जातेस !
अगं ,समोर जेवणा-या माणसाच्या घासात अश्रू पडले की दुस-या माणसाच्या
तोंडातील अन्नाचा घास गोठलेल्या रक्ताचा होतो ! मिस्टीक "poetry" म्हणजे दुसरे तरी काय असते ?
पण आज मला खोदायचेच आहे एक लाल तळे;
ज्याच्या काठावर असेल एक महावृक्ष जो साक्ष देईल बुद्धाच्या चेह-यावरच्या गूढ हास्याचा !
आणि त्या तळ्यात प्रतिध्वनित होतील अमृतानुभव

" धर्मात सुखम् । न सुखात सुखम् ।।"

आपण सातरंगी छटांना पाण्यात मिसळून टाकत डूंबून जाऊ पण
बुडून जाताना जर एकदम उघडलेच डोळे तर मात्र हातानेच मोजायचे -

"तीन कप पाणी
आणि सहा चमचे साखरं"

हसलीस ?.........

गुणगुण

मुक्ते ,
ज्या घरात माणसं गुणगुणत नाहीत ,मोकळ्या ह्रदयानं हसत नाहीत आणि पोटभर रडतही नाहीत ,
ते घर मला कळू शकत नाही.तेव्हाही समजलं नाही आणि आताही नाही.
सूर्य पकडावा इतकी कुवत कुणाचीच नसते पण तेजोमयतेच दर्शन घेण्याइतपत तर असतेच असते.
तरीही माणसे घुबडांसारखी का वागतात?
अगं ,सूर्य मावळताना नजरेआड होत असला तरी नाहीसा झालेला असतो कां?
असे कितीतरी खेळ निसर्ग आपल्यासमोर करत असताना माणूस मात्र अहंतेच्या पलीकडे काहीच कसे पाहू शकत नाही?

हसलीस ? छान.

पण ,आपण आपला प्रवास चालू ठेवू,
शेवट नसलेल्या शेवटाकडचा....

आणि हो, तुझी गुणगुण मात्र चालू ठेव ,निराकारातून साकार होण्याची !!