Tuesday, March 22, 2016

शब्द

मुक्ते,
हल्ली माणसं बोलत नाहीत , "चॅट" करतात.
दररोज शब्दांच्या शेकडो पत्रावली(पत्रावळी नव्हे) इकडून तिकडे पाठवल्या जातात.
बिच्यारे शब्द ,किती ससेहोलपट सहन करतात नाही?
शब्द निर्माण झाले त्याच प्रयोजन भावना पोहचवणे एवढच नसावा इथपर्यंत शब्दांची व्याप्ती वाढलेली आहे 
कि शब्दांना वेठीस धरल जातयं माहीत नाही.
कधी कधी मात्र बोलण्यासाठी शब्दांची गरज पडत नाही.
अशी चमकू नको ! 
हे बघ, अंगणात येणा-या चिमण्यांची चिवचिव , 
एखादं निरागस बाळ तुमच्याकडे पाहून वेगळयाच भाषेत हसते तो क्षण, 
तुम्ही वळचणीखाली उभे असताना डोके थेंबाथेंबाने भिजवणा-या पागोळ्या, 
जिवलग मित्र-मैत्रीणींची झालेली गळाभेट,
दूरवरच्या रानातली झ-यांची झुळझुळ....अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे शब्दाविण संवाद होतो.

या संदर्भात आरती प्रभुंची एक सुरेख ओळ आठवते -
" अर्थ चिमणे चिमणे...शब्द मादी
(बाकी सर्व)
बोलती मिनिटे मिनिटा ...विसंवादी"
आता मिनिटांचे सेकंद झाले आहेत इतकचं !
अशा चिमण्या चिमण्या अर्थानांच शब्दांची प्रसवता लाभते बाकी सगळा विसंवाद असतो.

"शब्दांच्या नकळत येती ...शब्दांच्या ओठा गाणी
शब्दांच्या नकळत येती .. ...शब्दांच्या डोळा पाणी
शब्दांना नसते दु:ख .. शब्दांना सुखही नसते
ते वाहतात जे ओझे ..ते तुमचे माझे असते "

No comments: