Monday, November 28, 2016

मोर नाचरा हवा

हे राजन्,
फरक असावा पण फारकत असु नये.
एक वेळ कापले तरी चालते कारण ते पुन्हा शिवता येते 
पण तोडलेले कधी जोडता येत नाही हे ध्यानात असु द्यावे.
माणसं वास्तवता आणि दैवत्व , चैतन्य आणि शरीर यात 
नेहमीच अंतर मानीत आली आहेत.
तत्वार्थ देखणेपण जोपर्यंत नजरेत उतरत नाही तोपर्यंत हे उमजणे कठीण आहे 
की तसे अंतर नाही.चिखलाच्या अस्तित्वाशिवाय कमळाचा प्रारंभ संभव आहे ? 
विटाळाशिवाय सृजन-संभव आहे? 
आपले पूर्वज ज्ञानी होते तितकेच रसिकही होते.
म्हणूनच पार्वतीच्या अंगावरच्या मळातून गजाननाची विमलमूर्ती निर्माण होऊ शकली.
समर्थांनी ती राजरंगी नाचवली.
आज आईला निरोप देताना काय मागायचे ?
 तिच्या अश्रूंचा अमृतानुभव हवा असेल तर एवढेच म्हणायचे -

"पदरावरती जरतारीचा
मोर नाचरा हवा
गं आई मला ,नेसवं
शालू नवा"

कविता


आता
असाही एक प्रवास , तुला मुक्तांगण
अन् माझी फक्त वाटचाल...

आता
असाही एक प्रवास , तुझे मुकेपण
माझा मात्र आतला आवाज....

आता
असाही एक प्रवास , तुझा मर्मबंध
अन् मला रूद्राक्षसाज ...

आता
असाही एक प्रवास , तुला मारलेली हाक
माझ्या अंगणात मात्र 
चिमणा किलबिलाट .....
चिमणा किलबिलाट ....

कविता


तिने विचारले लाडावून एकदा
नभातले काही तारे देशील का रे ,
आणून मला?
...वेणीत माळून घेण्यासाठी !

तो फक्त हसला कारण त्याला माहीत
होतं ,दूरून 'तारे' दिसणारे ते जवळून 
आगडोंब होते ,
...तिचे कुंतल जळताना पाहणे त्याला कसे
शक्य होते?

त्याने पर्याय दिला-
ह्रदयात साठवलेल्या अगणित गोड
क्षणांची ,तेजस्वी पण शीतल चंद्रकोर
लावशील का भाळी?
....ती खूप छान हसली !

प्राणातले ऊन


हे राजन् ,
लोक दिवसरात्र भजनं म्हणतात ,धूप आरत्या ,यज्ञ ,संकल्प काय काय म्हणून करतात.
पण मरण हे जीवनाचच एक अविभाज्य अंग आहे ," जन्म आणि मृत्यू" 
हे दोन्ही मिळूनच जीवन बनत या गोष्टीचा स्वीकार नाही ! 
खेदाची बाब आहे पण भ्रमाचा हा भोपळा फुटेस्तोवर 99% लोक शरीराच्या या सामान्य 
धर्माचा स्वीकार करू शकत नाहीत.
आपण म्हणतो ,जाऊ नको तिकडं ,कोणीतरी मेलं आहे ,अशुभ आहे.
अरे ,मरणात काय अशुभ आहे? जन्म तो शुभ आणि मरणं अशुभ? 
अशुभ असलं तर दोन्ही अशुभ होणार.शुभं असलं तर दोन्ही शुभ होणार.मुळातच चूक आहे.
मृत्यूचा स्वीकार करण्याच साहस लहानपणापासूनच मुलांना शिकवलं पाहीजे.
मृत्यू आला म्हणजे जीवनाचा अंत झाला असं समजणं चूक आहे.
जन्माबरोबर जीवन सुरू होत नाही आणि मृत्यूबरोबर त्याचा अंतही होत नाही !

"किती खोल आणि किती ओल वक्षी
तुझा सूर्य आणि तुझे चांदणे ?
प्राणातले ऊन प्राणात गेले
तुझ्या सागराची निळी तोरणे ..."

कविता


माझ्या व्यस्ततेत असतो
पैंजणांचा मंद स्वर
अन् बागडे तिथेच
आठवणींची एक खार !

काही वाटांचे नकाशे
काही ठसे ओळखीचे
साक्ष देतात अजून
वळणांवरची झाडे

चिंब पाऊस खट्याळ
पागोळ्यांचा सौदागर
आणि समोर झुलतो
गोल झालरी परकर !

एक संध्यासमयीचा
सूर ह्रदयात थेट
सापडत नाही परी
माझी तुटलेली भेट

Wednesday, August 3, 2016

भातुकली

हे राजन् ,  
काळाची सत्ता फक्त या शरीरावर चालते.आत्मभानावर नाही.
तरीही कोणत्या आदिम प्रेरणेने हे मेले शरीर हलत असते ,डुलत असते ? 
कोण कोणाला भातुकलीच्या या खेळात झुलवत असते?

मायावी मारीच्याची समज सीतेला नव्हती?
येणा-या काळाच्या भयसूचकतेचे संकेत श्रीरामाच्या अर्धांगिनीला कां कळत नव्हते?
पण तिचा खेळच वेगळा होता.
दिव्यत्वाचे लेणे पांघरून आलेली सीता कुठल्याही अटीवर ,सबबीवर 
आपले बालपण हरवायला तयारच नव्हती.पुढचे रामायण सर्वविदीत आहे.
या खेळात तिची काही गाडकी-मडकी फुटलीही असतील.असू देत.
पण तरीही तिने हा खेळ मांडला ! 
मागे पुढे आकांतच आकांत उभा केला.
आपण मात्र अशा हलत्या डुलत्या शरीरावर उगीचच आत्म्याचे थोर पहारे बसवून देतो.
सर्व वेदान्ताची उगीचच पोपटपंची करतो.
त्या ऐवजी अश्रूंचा आधार घ्यावा.
निसर्गाने माणसाला दिलेली ही सर्वात मोठी देणगी आहे.
जिभेपेक्षा डोळे अधिक बोलके असतात ,
पण डोळ्यांना ज्या अनेक भाषा अवगत असतात ,
त्यात अश्रूंइतकी प्रसन्न ,भावनापूर्ण आणि ह्रदयंगम अशी दुसरी कुठलीही भाषा नाही !


"अश्रूंना नाही रूप नि कसला रंग
का व्यर्थ जुळविता ओवी आणि अभंग
जाणारा जातो ,अनंत आहे काळ
 तरीही मांडावा भातुकलीचा हा खेळ "

Life and Death


Is there a division between life and death?
why do we regard death is something apart from life?
why are we afraid of death?
In other words ,is it possible ,while living ,to die 
which means coming to an end ,being as nothing?

In this world where everything is becoming more and more 
or becoming less and less ,
where everything is climbing ,achieving ,is it possible in such a world 
to know death?

Is it possible to end all memories ,not the memory of facts ,
the way to your house and so on,
but the inward attachment through memory 
to psychological security ,through which one seeks security ,happiness?
Is it not possible to put an end to all that-which means 
dying everyday so that there may be renewal tomorrow?

It is only then that one knows death while living.
Only in that dying ,putting an end to that continuity ,

is there renewal ,that creation which is eternal ................!

-K

कालाय तस्मै नमः


हे राजन् ,

जीवनात दु:खाचे अपरिहार्य अस्तित्व का असावे याचे कारण कधीच सापडत नाही. 
पण त्या दु:खाला कसे तोंड द्यावे ते काऴ शिकवित असतो.
माणूस मात्र जीवनाकडून हिशेब मागत असतो.
जसे काय जीवन म्हणजे गणिताचा पेपर किंवा भूमितीचा सिद्धांत.
मला वाटते ,असल्या समस्यांची उत्तरे शास्त्रे देऊ शकत नाहीत.
पण जी शक्ती गणितात नसते ती कलेत असते.
कला ,तत्वज्ञान आणि अनुभव यांच्या त्रिवेणी संगमातून निर्माण झालेले 
अद् भूत रसायन म्हणूनच जीवनाला सामोरे गेले पाहीजे.
मग सारी कोडी सुटतात.त्याचे स्वरूप हे ज्याचे-त्याचे वेगळे असू शकते. 


"कालो: गुरू । कालाय तस्मै नमः।।"


"नेहमीच नाही ,पण कधी असेही घडते
करकरीत वास्तवा जरीकिनार जडते
नेहमीच नाही ,पण कधीतरी असे होते
माती पदरी भरता रत्न हातासं येते"

Tuesday, June 21, 2016

मनात

हे राजन् ,
असण्यामध्ये सगळेच असतात पण नसण्यामध्ये असण्यालासुद्धा एक अर्थपूर्ण आशय असतो.
कांद्याची एक एक पाकळी सोडवता सोडवता शेवटी काय उरते? 

"उकल" ,नसूनही असण्याची !

कधी कधी आकाश भव्य वाटते , पाणी चवदार लागते , तोच तोच स्पर्श नवा वाटतो , 
तिच ती सरगम एक नवी समज देउन जाते . 
हे असं का घडतं कारण नाविन्य वस्तुत नसते ,असण्यात नसते.
ते असते "मनात".
आणि मनाला आजवर कुणीच पाहीलेलं नाही.....

Monday, June 6, 2016

गुलमोहर

आपल्याच दु:खात बुडून जाण्यापेक्षा थोडीशीच ,पण दुस-यांची जाण ठेवली तर?
कटू शब्दांचे बाण सुटायच्या आधी थोडासाचं पण संयम दाखवला तर?
एक साधासा गुलमोहर ,तोही मनासारखा बहरायची वाट पाहावी लागते.
नाही बहरला ,कोसळला,तरी आपण कोसळायच नसतं.तोल सुटू द्यायचा नसतो.
स्वतःच्या 'मी' पणात एवढं आत्मकेंद्रीत व्हायचं नसतं...

हसू नको ,मला माहीत आहे तुला काय म्हणायचं आहे.

"तु जिथे बघशील जे जे ,मी तुला दिसणार ते ते
तू मला ठेवू नको मांडून देव्हा-यात एका"

Monday, May 16, 2016

समईचा स्पर्श

हे राजन् ,
ईश्वराचे सारेच मार्ग विलक्षण असतात पण ते दुष्ट मात्र कधीच नसतात.
समईचा स्पर्श वा-याला होऊन तो शालिनतेने उजळावा तसेच 
आपल्या पिशवीभर अंधारात आपल्याच अस्तित्वाची एक ज्योत निरंतर तेवत असते. 
तिला हवं असतं एक आलिंगन, आतुन दाटलेल्या प्रेमाचं. 
हीच जाणिव थोडी व्यापक बनवली कि त्यातून साकार होते ती करूणा.जिथे सारे आभास संपतात.
पण एक आकांत उभा राहतो मागे पुढे.तो ओलांडताना आपसुक सिद्ध होतो तो असतो स्वानुभव.
नश्वरतेच्या पायावर उभे असलेल्या या जगात माणूस सुखाकडे धावत असतो 
आणि आत्मवंचना देणा-या आरशात स्वतःला पाहत असतो.
पण तरीही काहींना हीच जाणिव सतत बोचणी देत असते 
एका वेगळ्या आर्वतनात ,एका वेगळ्या मितीत.
किंमत असते स्वतःचेच अस्तित्व-

"नको व्हाया होती तेजाची जाणिव
आता वादळणे नशिबात ।
सुरवेड्या गायी उधळती धुळ
तैसाच उफाळ आता माझा।।"

Tuesday, May 10, 2016

सैराट

"याड लागलं रं, याड लागलं रं
रंगल तुझ्यात ,याड लागलं रं
वास येई साथ देई कस्तुरीचा
चाखलिया वारं गोड लागलं रं
       चांद भासतो,दिसाच मावळाया लागलं ...ऽऽऽऽऽ
       आस लागली मनात कालवाया लागलं......ऽऽऽऽऽ
याड लागलं रं, याड लागलं रं........"

-- नक्षत्रे ,कोसळणारी ,अगम्य धुंदावून सोडणारी, आस आहे प्रत्येक क्षणाक्षणात आणि तू आहेस ,तूच आहेस इथे तिथे सगळीकडे.छोट्या ,छोट्या आठवणींच्या कड्यातून ,अलंकृत ,झुलणा-या नादावणा-या पुलकीत
 सुगंधातुन तूच आहेस.दिवसरात्रीच्या मध्यावरंच्या ,प्राणांना हेलावून सोडणा-या ,काहूर लावणा-या ,चंपई उजेडातही तूच आहेस .....

"उलगना ,सुलगना जाळ आतल्या आतला
दुखणं हे देखणं गं एकलचं हाय साथीला
काजळीला उजळना पाजळून या वातीला
चांदणीला आवतानं धाडतोया रोज रातीला

झोप लागना सपान 
        ...जागवाया लागलं
पाखरू कसं आभाळ 
       ...पांघराया लागलं"

--जाणीव , अगाध शांततेतून झुळकणारी,
नितांत सुंदर आरस्पानी ,स्वसंवेद्य गुणगुण,क्षणाक्षणातं ओथंबणारी ,ह्रदयस्थ येउन अतिदूर जाणारी ,वेड लावणारी कधी ,न संपणारी केवळ आणि केवळ आर्ततेतूनच साकार होणारी ,करूणाष्टकांतून आकळणारी ,सारे भेद मिटवणारी ...फक्त जाणीव

याड लागलं रं, याड लागलं रं.....ऽऽऽ...

 

पडछाया

हे राजन्,


प्रश्न अस्तित्वाचा नाही.ते आज आहे उद्या नसेल.प्रश्न आहे तो लौकीकावर असलेल्या पारलौकीकाच्या पडछायेचा.
युगानुयुगे माणसाला भेडसावणा-या पण कधीच हाती न आलेल्या कोड्याचा.
वेदना समोर उभी ठाकली आणि माणसाच्या मनात 'परमेश्वर' जन्मला.
तो परमदयाळू आहे तो मला सर्व वेदनांपासून वाचवील अशी तारणहार प्रतिमा त्याने बनवली 
आणि हा मनःबुद्धीसंस्कार पिढ्यानपिढ्या अगणित मनांवर कोरला गेला ,पुढेही राहील.
असंख्य चेतन-अचेतन वस्तुमात्र रोज या ना त्या कारणाने वेदनाव्यथित होत असताना , 
हे देवा माझं भल कर (मनाने चांगले असतील) तर इतरांचही भलं कर 
अस मागण मानण्यातील निर्रथकता कधीच लक्षात न येणे इतकी बधिरता आणण्याचे सामर्थ्य याच 'परमेश्वरात' आहे.

"आभाळ झिरपते भरलेल्या माठात ।

अन् निळा माठ बघ भरला आभाळात ।।

आभाळ पलिकडे माठ फुटे हा इकडे ।

हा वेडा जमवी आभाळाचे तुकडे ।।"


Mother's Day

थकलेल्या पांथस्थाला सावली देणा-या वृक्षांना..

तृर्षात कंठाला तृप्त करणा-या तळ्यांना..

चिवचिवाट करत जागे करणा-या निरागस चिमण्यांना..

पाठीवर मायेची पाखरण करणा-या थरथरत्या हातांना..

काही ओळख नसताना जवळ बसून आधार देणा-या व्यथालयातील चेह-यांना..

सूरांची जादू हलकेच ऐकवून धुंदकरणा-या अनामिक रानपक्ष्यांना...

सर्व वेदना संपवून चिरनिद्रा देणा-या मृत्यूला ....

चराचरात भरून असलेल्या प्रकट अप्रकट ममत्वाच्या स्पर्शांना ..

बुद्धीपूर्वक सादर प्रणाम!

आरसा

आरसा ,एक आभासाची भूल.गुंगवून फसवणारा. 

दिसणा-या प्रतिमेला खरे मानून ,आत्मवंचनेची थोडीही जाणीव न होउ देता अडकवणारा.

पण काळ मात्र सर्व आभासांना कधीतरी चूड लावतोच.

मग खरी प्रतिमा दिसते.

हे एकदा समजले की प्रतिमा विभ्रमांचा भुलभुलैयांचे खेळ प्रत्यक्षात दिसू लागतात-आरशात नाही.

Tuesday, March 22, 2016

शब्द

मुक्ते,
हल्ली माणसं बोलत नाहीत , "चॅट" करतात.
दररोज शब्दांच्या शेकडो पत्रावली(पत्रावळी नव्हे) इकडून तिकडे पाठवल्या जातात.
बिच्यारे शब्द ,किती ससेहोलपट सहन करतात नाही?
शब्द निर्माण झाले त्याच प्रयोजन भावना पोहचवणे एवढच नसावा इथपर्यंत शब्दांची व्याप्ती वाढलेली आहे 
कि शब्दांना वेठीस धरल जातयं माहीत नाही.
कधी कधी मात्र बोलण्यासाठी शब्दांची गरज पडत नाही.
अशी चमकू नको ! 
हे बघ, अंगणात येणा-या चिमण्यांची चिवचिव , 
एखादं निरागस बाळ तुमच्याकडे पाहून वेगळयाच भाषेत हसते तो क्षण, 
तुम्ही वळचणीखाली उभे असताना डोके थेंबाथेंबाने भिजवणा-या पागोळ्या, 
जिवलग मित्र-मैत्रीणींची झालेली गळाभेट,
दूरवरच्या रानातली झ-यांची झुळझुळ....अशी अनेक उदाहरणं आहेत जिथे शब्दाविण संवाद होतो.

या संदर्भात आरती प्रभुंची एक सुरेख ओळ आठवते -
" अर्थ चिमणे चिमणे...शब्द मादी
(बाकी सर्व)
बोलती मिनिटे मिनिटा ...विसंवादी"
आता मिनिटांचे सेकंद झाले आहेत इतकचं !
अशा चिमण्या चिमण्या अर्थानांच शब्दांची प्रसवता लाभते बाकी सगळा विसंवाद असतो.

"शब्दांच्या नकळत येती ...शब्दांच्या ओठा गाणी
शब्दांच्या नकळत येती .. ...शब्दांच्या डोळा पाणी
शब्दांना नसते दु:ख .. शब्दांना सुखही नसते
ते वाहतात जे ओझे ..ते तुमचे माझे असते "

Wednesday, March 16, 2016

सोबत

***  लेखकाचे नाव माहीत नाही पण जरूर वाचावे असे काही


आजकाल कुणाशीही बोलावंसं वाटत नाही. खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहेरे. 

ज्याची पाठ फिरेल त्याची निंदा करणारे. ह्यांची मानसिकता इतकी चीप असते ना, की नको वाटतं....!

इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात ? 

ह्यात "आपले लोक" पण असतात हे विशेष!

ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला ऍडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका "नकाराने" बदललेले बघितले आणि वाटलं, 'आपण एकटे असतो तेच बरं असतं.'

ह्यांच्यापेक्षा पुस्तकांमध्ये आणि छंदांमध्ये रमावं, मन प्रसन्न रहातं आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता...

कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो. 

त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते.

प्रत्येकाचे मूडस् संभाळणं, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो, सतत दुसऱ्याच्या गरजांचा विचार करताना

 "स्वतःला काय हवं आहे?"

हा प्रश्न कधी मागे राहतो हे कळतच नाही. आणि इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही.

मग अशा वेळी प्रश्न पडतो 

"हे सगळं कशासाठी ?"

खूप विचार केला की ह्या प्रश्नाचं एक उत्तर असं मिळतं ते म्हणजे -

 "आपण एकटेपणाला घाबरतो."

सुरक्षतेसाठी कळपात राहीलं पाहिजे ही एक चुकीची मानसिकता आपल्यात रुजलेली असते. 

एकटे पडू ह्या भीतीमुळे अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो. 

मनात नसूनही अनेक गोष्टी स्वीकारत जातो. मोठे होतो पण "सोबत", "मैत्री" ह्या गोष्टींचे आणि नात्यांचे खरे अर्थ विसरतो. 

लोकांनी शरीराने आपल्या सोबत असण्याला "सोबत" अस गोंडस नाव देतो....

आपणही तसेच खोटे वागत जातो, पण एक क्षण असा येतो जेव्हा हा माणसांचा गोतावळा नकोसा होतो. 

मोजकीच पण चांगली माणसं हवीत असं वाटू लागतं. ह्या मुखवट्या मागचे चेहरे भेसूर वाटू लागतात आणि आपण पुन्हा स्वतःकडे वळतो.

जाणीवेचा एकच क्षण असतो आणि तो आपल्या हातून कधीच निसटू द्यायचा नसतो.

'मी उत्तम तेच करीन आणि चांगल्या लोकांच्या सोबतीतच राहीन,' असा मनाशी निश्चय केला की आपली निवड बदलत जाते आणि पर्यायाने आयुष्यही बदलतं. 

मोजकीच, पण प्रेमळ, आपल्याशी प्रामाणिक भावनेने जोडलेली, वेळ प्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी-

"सोबत"...!

माणसांच्या गर्दीत चालताना आपला दीपस्तंभ कुणाला मानायचं हे आपणच ठरवायचं असतं. 

गोतावळ्यात राहूनही आपण एकटेच असतो त्यापेक्षा थोडसं ह्या सगळ्यांपासून लांब जाऊन बघावं. खूप मनःशांती मिळते. 

असा एक ब्रेक घेतला की आयुष्यातील सोबतीचं वर्तुळ नव्याने आखण्याची गरज आहे हे लक्षात येते... 

थोडेच पण मनापासून आपले असलेले सोबती असावेत.

आणि सोबत छंदांची जोड....

Friday, March 11, 2016

सूत्र

"जिवलगा ,अजूनही तू मृत्यू मानतोस?" तू हादरलास.

माझ्या प्रश्राने तुझा थरकाप उडाला.सारी परिमाणे गळून पडली.
सर्व सीमा संपून गेल्या.चढाओढ संपून गेली आणि सारे शब्द थांबून गेले.
तू निष्प्रश्न आणि निरूत्तर झालास.आपण दोघेही सा-या श्रेणी , सा-या पाय-या ओलांडून पलीकडे गेलो.
आता आपल्या दोघांमध्ये कुणी लहान कुणी मोठ उरल नाही.तू "तू" उरला नाहीस मी "मी" उरले नाही.
जवळ आणि दूर काही उरले नाही.आपल्याला सूत्र सापडले होते-स्वतःची खेळणी स्वतःच मोडून टाकण्याचे.


"मेघांत अडकले रंग । कुणाचा संग ।
मिळविती पेशी? ।
चढशील वाट? । रक्तात घाट ।
पलिकडे चंन्द्र अविनाशी ।।"

कविता

ऐकलसं काय गो कुंदा ,काय झाला एकदा
दिदि आमची चिरात व्हती खसा खसा कांदा

कांद्यान आपला काम केल्यान डोळ्यात इला पाणी
दिदि रडली ढसा ढसा कांदो कापल्यान भसा भसा

आये करवादली गो मेले लवकरदी कांदो
पावणे बघूक येवचे हत बेगींदा तयार हो

इतक्यात इलो नामगो म्हणत "चल्ला गे काय?"
पावणे येव्न बसले हत घरी हाडू काय?"

दिदि आमची गुणाची मउसाजूक मनाची
सुरसुरल्या नाकान विळो घेव्न पळाली

बघान तिची घाय आमका इला हसू
नामग्या वायंज थांब तेंका दे बसू

थोड्या येळान दिदी ब्ह्रयार आली नटून
पन गोरो चेहरो झालो लाल रडरडरडून 

कांद्यान वांदो केल्यान पन दिदी छान दिसली
कांदे-पोहे खावून पावन्यांनी पसंती कळवली

ऐकलसं काय गो कुंदा ,काय झाला एकदा
दिदि आमची चिरात व्हती खसा खसा कांदा.....

Thursday, March 10, 2016

सुखाच्या पलीकडे

मुक्ते,
ज्याला वास्तव अर्थाने आपण सुख म्हणतो ,त्यात नेहमीच माणूस सुखी होतो असे नाही.
पण दु:खाच्या पलीकडे जसं एक सुख असतं ,तसच सुखाच्याही पलीकडंच एक सुख असतं.
दु:खाच्या पलीकडच्या सुखाने दु:खांचा परिहार होण्याची शक्यता असते.
पण ,सुखाच्या पलीकडच्या सुखात सुख आणि दु:ख दोन्ही सामावून घेतलेली असतातं.

"पार्वतीच्या पायाखाली
भडकली आग
जटेतली गंगा गेली
तिच्या मागोमाग

चंद्रकोर सुनी सुनी
गंगेसाठी झुरे
कोण कोणासाठी मरे?
कोण कोणासाठी उरे?"

हा उखाणा सोडव ,उत्तर सापडेल !

Sunday, March 6, 2016

आज जाने की जिद न करो


मुक्ते ,
ही सरगम पार वेडी असते.रोज मला खारीप्रमाणे खुणावत राहते,
जवळ गेलो कि लाजते आणि दूर पळून जाते.
आणि मग 'शब्दाविण संवादू' असा आमचा खेळ चालत राहतो.
कधी मी झोपलेला असताना अचानक काहीतरी कानात गुणगुणते आणि मला जाग आणते.
तिच्या मागुन धावता धावता माझी पुरती दमछाक होते.
मी दमलो की कदचित तिला माझी दया येत असावी कारण आता ती बोलक्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत बसते. 
हळूहळू काही ऐकू येते मला.अंधाराचा गंधार होतो आणि त्या अमर्याद पोकऴीत मी हरवून जातो.
अगणित अलंकार एखाद्या प्रपाताप्रमाणे कोसळतात माझ्यावर ,
आणि मग ही खारूबाई हसत सुटते आणि म्हणते- 

"आज जाने की जिद न करो
यू ही पहलू मे बैठे रहो 
हाय ,मर जायेंगे ,हम तो लूट जायेंगे
ऐसी बाते किया न करो
आज जाने की जिद न करो..."

धन्य बाई तुझी !!

भींगरूटी


मुक्ते,

श्रीचक्रधरांचा एक छान दृष्टांत आहे-

भींगरूटी असे : ते किटकीतें पाहे :
धरी : कांटा रोवी :
नेऊनि आपुलेया घरांतु घाली : दार लिंपौनी जाए :
'एउनि मागुती माते खाईल ' म्हणौनि
भेणे तीएतें चींती :
चिंतीत चिंतीतां तीसीहि पाख नीगति :
तेही तीएसारीखी होए ।।

अर्थ - 
गांधीलमाशी कीटकीस दंश करून आपल्या घरात कोंडून ठेवते. गांधीलमाशी आपल्याला खाणार या भीतीने कीटकीस तिचे सतत स्मरण होते.तिच्या या चिंतेनेच तिला पंख फुटतात व ती गांधीलमाशीचे रूप धारण करते.

अद्वैत-द्वैताचा हा खेळ म्हणावा ? मला वाटत काहीच म्हणू नये.फक्त पाहवं.तात्पर्य -
"मोर हवा तर आपणचं मोर व्हायचं.जे जे हवं ते ते आपणंच व्हायचं "